इंदिरा पाझर तलावात सोडले हॉटेलचे सांडपाणी   

किरण खुडे

पाच गावांमध्ये आरोग्याला धोका 

राजगुरूनगर : सांडभोरवाडी-तिन्हेवाडी (ता.खेड) परिसरात असलेल्या इंदिरा पाझर तलावात एका हॉटेल व्यावसाईकाने खड्डयात साठवलेले सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
 
पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाट ओलांडल्यानंतर एक हॉटेल आहे. हॉटेल व्यावसाईकाने शोषखड्डा करून सांडपाणी साठवलेला खड्डा जेसीबी यंत्राने फोडला. डोंगर उताराने हे पाणी ओढ्याच्या पात्राद्वारे थेट तलावाच्या पाण्यात आले. खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडीसह जैदवाडी, वरची भांबुरवाडी, तुकाईवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील पेठ अशा पाच गावांच्या पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबुन आहेत. हॉटेल चालकाच्या कृत्यामुळे खेड आणि आंबेगाव तालुक्यातील पाच गावांच्या नागरिकांच्या आरोग्याला इजा पोहचण्याची भीती यामुळे व्यक्त होत आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. असे पाणी पिल्यास जुलाब- उलट्या, साथीच्या आजारांचा त्रास ग्रामस्थांना होऊ शकतो, असे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
सबंधित हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांसाठी बनवले जाणारे नाश्ता, जेवण त्यातील धुणी भांडी, स्वच्छता गृहाचे मलमूत्र असे सर्व घाण व दूषित पाणी हॉटेलच्या मागील बाजूस जमिनीत मोठा शोषखड्डा करून साठवले जाते. उतारावर असलेल्या या खड्डयातून पावसाळा सुरू झाला की सांडपाणी सोयीस्कर पद्धतीने ओढ्यात सोडले जाते. असा काही स्थानिक नागरीकांचा आरोप आहे. 
 
हॉटेलमधील सांडपाणी सोडल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या सांडपाण्यामध्ये अनेक हानिकारक रासायनिक आणि जैविक घटक असतात, ज्यामुळे तलावाचे पाणी दूषित होऊन आणि जलचर प्राण्यावर परिणाम झाला आहे. या परिसरात शुक्रवारी (६जून) दुपारी दमदार पाऊस झाला. धुवांधार पावसाने सगळीकडून मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. इंदिरा पाझर तलावाच्या डोंगर परिसरात पावसाच्या पाण्याने ओढे-नाले वाहू लागले. या स्थितीचा फायदा घेऊन हॉटेल चालकाने वर्ष, दोन वर्ष साठवलेले शोषखड्डा टाकीतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी जेसीबी मशीन लाऊन, बांध फोडून ओढ्यात सोडले. मोठ्या स्वरूपातील हे पाणी तलावात मिसळल्याने तलावातील पुर्ण पाणी दुषित झाले आहे. शिवाय हा परिसर डोंगरदर्‍यांचा व वनविभाग असलेला आहे. वन्यप्राणी येथेच पाणी प्यायला येत असतात. 
 
दरम्यान, तिन्हेवाडीच्या सरपंच प्रतिक्षा पाचारणे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावर हॉटेल व्यावसाईकाने आठ दिवसात या सांडपाण्याची व्यवस्था करतो. असे संबंधितांना उत्तर दिले.

Related Articles